गुरुवार, १७ जून, २०१०

सोमवार, १४ जून, २०१०

DADA KONDKE

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.....

व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले.
पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली.
द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट
व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या
चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.......
पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे.
दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार
क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू'च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता.
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते.
नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे
सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून
हळूहळू वगनाट्य, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले.
नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व
कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.
दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले.
लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली.
सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे
पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला.......
नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले.
तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.
कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला.
तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला.दादांना भालजींकडे पाठवले.
प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वत:ची नाटक
कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली.
तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खंकरपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावीत केलेलेच होते.
हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला.
सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी
बनवले...... १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात
काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... ' चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच
दादांना भालजींकडे पाठवले.
दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण
नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी
मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे
आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या
ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या
ह्या चित्रपटा नंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाइन लावून दिली. स्वत:च्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या
चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला.